आपल्या वाढदिवशी काय करावे आणि काय करू नये? दान करावे की नको ?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो. त्यामुळेच वाढदिवस सर्वच जण साजरा करतात, गरीब असो वा श्रीमंत. काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमवेत पार्टी करतात.

वाढदिवस कसाही साजरा केला तरी त्यातून आनंद घेणे महत्त्वाचे असा विचार साधारणपणे करण्यात येतो, परंतु असा विचार करून आपण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.अलीकडे सगळ्याच बाबतीत पाश्चात्यांचे अनुकरण करण्याची आपल्याला सवय लागली आहे.

वाढदिवसासारखा आनंदाचा दिवस, तोही पार्टी करत आपण बाहेर घालवतो. पूर्वी घरगुती स्वरूपात आप्त नातलगांबरोबर वाढदिवस साजरा केला जाई. आई, आजी, ताई औक्षण करत असे. त्यांच्याकडून मिळालेले पाच पन्नास रुपये, वडिलांनी दिलेले नवे कपडे, सायकल, खेळणी, पुस्तक हे मोठ्या गिफ्ट पेक्षा बहुमूल्य वाटत असे.

सकाळी देव दर्शन, संध्याकाळी गोड धोड जेवणाचा बेत, शाळेत शिक्षकांच्या आणि वर्ग मित्रांच्या शुभेच्छा यामुळे वाढदिवस आनंदात साजरा होत असे. मात्र अलीकडे वाढदिवसाला जे बीभत्स रूप आले आहे. ते पाहता धर्मशास्त्राने घालून दिलेले नियम आणि त्यामागची कारणीमिमांसा यांची आठवण करून देणे अपरिहार्य ठरत आहे.

आपल्या धर्मशास्त्रांनी काही मूलभूत गोष्टी सांगीतल्या आहेत. शास्त्रांनी सांगीतलेल्या गोष्टी समजून न घेतल्यांने अनेकदा आपण चुकीच्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो. सगळे करतात म्हणून आपणही चुकीच्या गोष्टी करणे हे खरे तर आपल्या कमकुवत मनाचेच लक्षण आहे.

मात्र आपण त्याला प्रतिष्ठेचा मुलामा देऊन स्वताचे समाधान करून घेत असतो. येथे आपण जाणून घेऊ की वाढदिवशी काय करावे आणि काय करू नये.वाढदिवशी नख, केस कापणे टाळावे. वाहनाने प्रवास करू नये. भांडण, हिंसा, अभक्ष्यभक्षण अर्थात मांस, अपेयपान अर्थात मद्य, दारू आणि स्त्रीसंपर्क यापासून कटाक्षाने दूर रहावे.

दिवा विझवणे ही बाब मृत्यूशी निगडीत आहे. त्यामुळे मेणबत्ती पेटवून विझविणे वगैरे प्रकार करू नये. हिंदू संस्कृतीनुसार दिवसाची सुरूवात मध्यरात्री नव्हे तर सूर्योदयाने होत असते.

यावेळी वातावरणात सात्विकता अधिक असते. सूर्योदयानंतर दिले गेलेल्या शुभेच्छा या अधिक फलदायी असतात. त्यामुळे मध्यरात्री शुभेच्छा देण्याचा मोह टाळावा.

वाढदिवशी ग्रामदैवताचे दर्शन करावे. मातापित्यांचा आणि वडिलधा-यांचा आशीर्वाद घ्यावा. वाढदिवस हा केवळ गोड धोड खाण्याचा दिवस नाही, तर आयुष्यात एक एक टप्पा पुढे सर करत असताना वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा दिवस आहे.

बालपणी जबाबदाऱ्यांचे भान नसते, परंतु कळत्या वयापासून आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी सिंहावलोकन करून आयुष्याची बेरीज वजाबाकी करणे गरजेचे आहे. यासाठीच बालपणी संस्कार महत्त्वाचे आहेत.

वाढदिवस रात्री साजरा करण्याऐवजी नेहमी सूर्योदयात साजरा करावा. सूर्य नारायण उगवल्यावर सर्व प्रथम लवकर उठून स्नान वगैरे करून सूर्यदेवाला नमस्कार करावा.वाढदिवस तारखेनुसार नाही तर तिथीनुसार साजरा केला पाहिजे.

त्या तिथीला वाहणारी ऊर्जा आपल्या शरीरात असलेल्या लहरींशी अगदी जवळून जुळते. म्हणून तिथीला वाढदिवस साजरा करावा. घरातल्या मोठ्यांचे तसेच गुरुजनांचे आशीर्वाद घ्यावेत, देवदर्शन घ्यावे.

घरातल्या माता भगिनींनी औक्षण करून दिर्घआयुष्याचा आशीर्वाद द्यावा. आपली संस्कृती दिवा लावायला शिकवते, विझवायला नाही. कारण आपण अग्नी पूजा करतो आणि अग्नी प्रज्वलीत करणे शुभ मानतो.

वाढदिवसाच्या दिवशी यथाशक्ती दानधर्म करावा. धार्मिक तसेच समाज कार्याला आर्थिक हातभार लावावा. अन्नदान करावे. नवे कपडे ही केवळ हौस नाही तर त्यामुळे पुढच्या आयुष्याकडे नव्याने बघण्याची ऊर्जा मिळावी असा त्यामागचा संकेत आहे.

वाढदिवसाला रात्री बारा वाजता केक कापण्याची फॅशन झाली आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री १२ वाजता तारीख बदलत असली तरी हिंदू पंचांगानुसार सूर्योदयानंतर नवा दिवस सुरु होतो. म्हणून आपण आपल्याच संस्कृतीचा आग्रह धरला पाहिजे. कारण कोणतेही शुभ कार्य उजेडात करावे, अंधारात नाही, असे त्यामागचे तत्त्वज्ञान आहे.

केक ऐवजी दुसरे एखादे पक्वान्न करावे आणि केक कापणार असल्यास मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करू नये. दिव्याच्या अखंड ज्योतीप्रमाणे आपले आयुष्य उजळून निघावे असे वाटत असेल तर दिवा विझवू नये उलट ज्येष्ठ भगिनींकडून औक्षण करून घ्यावे.

एक खास गोष्ट लक्षात ठेवा की वाढदिवसाच्या दिवशी केस कापू नयेत. केस कापणे हा स्वच्छतेचा एक भाग असला तरी हा दिवस त्या कामासाठी निवडू नये. या दिवशी शक्य तितके सकारात्मक सात्विक राहावे.

येणाऱ्या वर्षात कोणत्या गोष्टींना टाळावे आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे यासाठी ते गरजेचे आहे. तसेच या दिवशी आपण दान नक्की करावे. ते दान अन्नदान असेल,

धान्य अथवा धन दान असेल, नवीन कपडे काहीही असेल पण ते करावे. यामुळे आपली मती शुद्ध होते तसेच आपल जीवन सुखी राहील.तसेच बुद्धी शुद्ध होते. धन शुद्ध झाले की त्यात वृध्दी होते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!