नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत.
चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे.
तसेच गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो.
म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली.
तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा, गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे.
म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो.नृसिंह सरस्वतींनी चौदाव्या शतकात लिहिलेला ‘श्री गुरुचरित्र’ हा दत्त भक्तांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा ग्रंथ.
भाविक भक्तिभावाने त्याची पारायणे करतात. श्रीदत्तांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा नृसिंह सरस्वती व तिसरा अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, असे सांगतात. त्यातील पहिला अवतार श्रीपाद विल्लभ यांनी कृष्णा पंचगंगा संगमावर नृसिंहवाडी येथे जपानुष्ठान केले.
भीमा अमरजा संगमावर गाणगापूर येथे त्यांचे वास्तव्य दोन तपे म्हणजे चोवीस वर्षे होते. त्यामुळे गाणगापूरला दत्तपंथीयांत अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायात आलेल्या दत्त कथेचा आधी परिचय मला महत्त्वाचा वाटतो.
असे म्हटले जाते की ब्रह्मदेवाचे जे सात पुत्र होते त्यात अत्री प्रमुख होत. त्यांची पत्नी अनुसूया. ती रुपवती, पतिव्रता, पतिसेवा तत्पर मनापासून अतिथी सेवा करणे हा तिचा आचार होता. योग, ज्ञान, संन्यास, वैराग्य, सातत्य, चिकाटी, चमत्कार व कडक शिस्त व शिस्तीचे कडक आचरण म्हणजे गुरुचरित्र होय.
या सगळ्या गोष्टीचे एकत्रित करून सामान्य माणसाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भक्ती, मुक्ती, अनन्यसाधारण भरवसा (विश्वास) ठेवण्याचा प्रयत्न करून साकल्याने विचार करावयास लावणारे दैवत आहे. हा विषय व यातील आशय हा पूर्ण श्रद्धेचा आहे.
पण या गोष्टी सातत्याने पार पाडावयाच्या म्हणजे शरीर प्रकृती उत्तम हवी. निरामय हवी. तरच हातून सेवा घडते. धर्मस्थापना हेच मुख्य कार्य असल्यामुळे नृसिंह सरस्वतींनी दत्त भक्ती स्वीकारली. त्यामुळे अनेक भक्त वाढले.
श्रीगुरूंनी आपल्या दीर्घ आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीतही लोकरक्षणाचे व धर्मसंस्थापनाचे फार मोठे अमोल कार्य केले आहे. नृसिंहवाडी व गाणगापूर या जुन्या तीर्थाना नवा उजाळा देऊन त्यांचे माहात्म्य वाढवले.
लोकांना सन्मार्ग दाखवला. अनेकांच्या भौतिक व्याधी दूर केल्या. अनेक लोकांना आत्मिक समाधान प्राप्त करून दिले. व्रते व वैकल्ये आणि कर्मकांड यांची पुनस्र्थापना करून सर्वसामान्य लोकांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला.
समाजातील तळागाळातील लोकांनाही त्यांनी तेराव्या शतकाच्या अखेपर्यंत दत्त उपासनेचा जो प्रवाह वाहत आला त्याला सजीव करण्याचे काम नृसिंह सरस्वतींनी केले. त्यांचे जीवनकार्य केवळ दत्त उपासनेच्या पुरते नसून सर्व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय जीवनात दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे.
त्यांच्या काळात संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातूनच या संतांचा उदय झाला. त्या काळात आक्रमशील संस्कृतीने हिंदू परंपरेचा नाश करण्याचा प्रयत्न सर्व महाराष्ट्रभर चालविला होता. त्या महान संकटातून महाराष्ट्राला मुक्त करण्याचे काम स्वामींनी केले.
असा अनेक लोकांचा दत्त, दत्तपंथ व स्वामींचे कार्य याकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन होता. पण सर्वाचा सारांश एकच होता. धर्मस्थापना हेच मुख्य कार्य असल्यामुळे महाराजांनी एका विशिष्ट देवाची भक्ती वाढविली नाही. तप, सदाचरण, ध्यानधारणा यालाच महत्त्व होते.
धर्माधर्मातील कटुता न वाढावी व हिंदू धर्माचे व समाजाचे परधर्मीयांकडून संरक्षण केले. हेच मुख्य कार्य आहे. त्याचे वर्णन गुरुचरित्रात आहे. त्याच प्रमाणे वैदिक धर्माचे रक्षण व त्याची वाढ हाही मुख्य हेतू होता.
श्रीज्ञानेश्वरांच्या वारकऱ्यांनी महाराष्ट्रातील फार मोठय़ा वर्गाचा मनुष्य या नात्याने अध:पात होऊ दिला नाही. नृसिंह सरस्वतीचे कार्य नंतरच होते. जनतेत आत्मविश्वास उत्पन्न करून मनोधैर्य वाढवले. भक्तीमार्गाकडे वळवले.
गायनावर महाराजांची फार छाप होती. त्यांना आवड होती. त्यामुळे जनतेच्या मुखी याचे वर्णन करणारी काव्ये होती. दत्तप्रेमींना मराठी भाषेप्रमाणे संस्कृत स्तोत्रांबद्दलही आदर आहे. गुरुचरित्रातील कित्येक ओव्यांना मंत्राचे सामथ्र्य आहे.
किंवा हा सगळा ग्रंथच प्रभावी मंत्र आहे, असे मानले जाते. गुरुचरित्राचे पारायण कसे व किती दिवसांत करावे. याचेही मार्गदर्शन या या ग्रंथात आहे. सप्ताह वाचावयाची पद्धतीही सांगितली आहे. शुचिर्भूत होऊन, रांगोळी काढून, स्नानसंध्या करून, संकल्प करून एकाच आसनावर बसावे.
अतत्त्वार्थ भाषण करू नये. सुंदर दिवा लावून त्याची पूजा करून वडील माणसांना नमस्कार करून पूर्वेकडे तोंड करून वाचावयास बसावे. ७। १८। २८। ३४। ३७। ४३। ५१ अशी सप्ताहाची पद्धत आहे. सर्व दिवस भजन, पूजन, मनन, चिंतन करावे.
रोज हलका व प्रमाणबद्ध थोडा आहार घ्यावा. रात्री धाबळी अथवा घोंगडीवर झोपावे. कोणत्याही प्रकारच्या वासना निर्माण होणार नाहीत असे आचरण असावे, असे सातव्या दिवसांपर्यंत वाचन करून ब्राह्मण, सुवासिनींना यथाशक्ती भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे.
मोठेपणा मिरवण्यासाठी, श्रीमंतीची ऐट दाखवण्यासाठी वेगळे काही करू नये. मन पवित्र, शुद्ध असावे. त्याचप्रमाणे आचरणही पवित्र हवे. सर्वसाधारण लोकांसाठी पारायण करताना संकल्प करावा. अशा प्रकारे सात दिवस पारायण करून त्याचे यथाविधी उद्यापन करावे. उद्यापण करताना आपण गरीब व गरजूंना दान करावे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.