गोंदवलेकर महाराजांचा अतिशय सुरेख असा अनुभव….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, रविवारी २१ डिसेंबर २००८ या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा समाधीदिन होता. आयुष्यात एकदा तरी श्रीमहाराजांच्या गोंदवले येथे होणार्‍या समाधीउत्सवात सहभागी व्हावे अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती.

यावर्षी गोंदवल्यास जाऊन उत्सवात सहभागी व्हायचे असे खूप दिवसांपासून ठरविले होते. परंतु शेवटच्या क्षणी काही व्यक्तिगत कारणामुळे सर्व योजना रद्द करावी लागली. मनातून थोडे वाईट वाटत होते.

अचानक माझ्या एका नातेवाईकाने एक वेगळा पर्याय सुचविला. त्यांनी अशी माहिती दिली की पुण्यामध्ये लक्ष्मी रस्त्यावर लिकते राम मंदिर आहे. हे मंदिर श्रीमहाराजांनी स्थापन केलेले आहे. त्या मंदिरात दरवर्षी पुण्यातील भक्त श्रीमहाराजांचा समाधी उत्सव साजरा करतात.

तिथे तुला पहाटे जाऊन श्रीमहाराजांच्या समाधीउत्सवात सहभागी होता येईल. हे समजल्यावर मनातून आनंद झाला. श्रीमहाराजांनीच मला ही माहिती देण्याची माझ्या नातेवाईकाला बुद्धी दिली असे मला वाटले.

रविवारी पहाटे गजर लावून २ वाजता उठलो. चटकन सर्व आवरून घरातल्या देवांची व श्रीमहाराजांच्या तसबीरीची पूजा केली व घरातल्या इतर काही जणांबरोबर लिकते राम मंदिरात पावणेचारच्या सुमारास पोहोचलो. श्रीमहाराजांच्या समाधीची वेळ पहाटे ५:५५ अशी आहे.

लिकते राम मंदिर जुन्या पद्धतीचे असून अतिशय सुंदर आहे. सुमारे १००० स्क्वेअर फुटाच्या दिवाणाखान्यामध्ये एका बाजूला श्रीराम, श्रीलक्ष्मण, श्रीसीता व श्री हनुमानाच्या मूर्ती आहेत. बरोबर विरूद्ध बाजूला श्रीमहाराजांची ५-६ फूट उंचीची एक तसबीर आहे.

भिंतींवर श्रीमहाराज व इतर देवांच्या काही तसबिरी आहेत. मंदिरात प्रवेश केल्याकेल्या तिथे अतिशय पावित्र्य जाणवले.

ज्या ठिकाणी परमेश्वराची नित्य भक्ती होते व जिथे नियमित भजन्-कीर्तन्-नामस्मरण होते अशा सर्व ठिकाणी मनाला पावित्र्य जाणविते व अंतर्यामी सूक्ष्म असा आनंद होतो.

४ वाजल्यानंतर अनेक भक्त जमा झाले. त्या मंदिरात कमीतकमी १५० भक्त बसले होते. शिवाय बाहेरही अनेक भक्त उभे होते.

बरोबर ४:३० वाजता सर्वांनी श्रीमहाराजांचा जयघोष केला व एका भक्ताने निरनिराळ्या देवांच्या काकड आरत्या व भूपाळ्या म्हणायला सुरवात केली. इतर सर्व भक्त त्याच्यामागून म्हणत होते. भल्या पहाटेची प्रसन्न वेळ, आजूबाजूची शांतता, मंदिरातील पावित्र्य व परमेश्वराची स्तुती याने सर्व वातावरण भारून गेले होते.

५:१५ वाजता काकड आरती संपवून सर्व भक्त काही काळ नामस्मरण करू लागले. बरोबर ५:३० वाजता सर्वांनी नामस्मरण थांबविले. त्यानंतर एका भक्ताने श्री महाराजांच्या चरित्रातील त्यांच्या अखेरच्या

दिवसांतील घटनांचे वर्णन वाचायला सुरवात केली. तो भक्त त्या वाचनाशी इतका एकरूप झाला होता की मध्येच त्याला एकदम भरून आले. काही क्षणातच स्वत:ला सावरून श्री महाराजांच्या समाधीपर्यंत पूर्ण वर्णन वाचून काढले.

आता ५:५० झाले होते. सर्व भक्तांनी “श्रीराम”, “श्रीराम” असा जयघोष सुरू केला. जयघोष सुरू झाल्यावर माझे मन अतिशय भारावून गेले होते. श्री महाराज श्रीरामांच्या भेटीस कायमचे निघाले असून सर्व भक्त श्रीरामांचा जयघोष करून त्यांना निरोप देत आहेत असे मला मनोमन वाटले.

बरोबर ५:५५ ला सर्व भक्तांनी श्रीमहाराजांचा जयघोष केला. १९१३ साली याच दिवशी याच वेळी श्रीमहाराजांनी महासमाधी घेतली होती.

नंतर ७ वाजेपर्यंत पंचपदी होऊन कार्यक्रम संपला. श्री महाराजांच्या कृपेने ती पहाट अतिशय आनंदात गेली व आयुष्यात प्रथमच श्रीमहाराजांच्या समाधीउत्सवाचा आनंद घेता आला.

महाराज नेहमी सांगत की सत्कर्म करा, निरंतर प्रयत्न करा तुम्हाला काही कमी पडत नाही.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!